विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा : ॲड.राजेंद्र म्हमाने

Admin

 


जत : डिजिटल हॅलो प्रभात 

 विद्यार्थीदशेत कळत न-कळत कायदा मोडला जातो. अशावेळी दंड व शिक्षाही होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच कायद्याचा सखोल अभ्यास करून वर्तन केले तर त्यांची प्रगती होते, असे उद्गार ॲड. राजेंद्र म्हमाने यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या मौजे खलाटी, ता. जत येथील निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी 'कायदा आपल्या दारी' या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून खलाटी गावचे ॲड. संदीप कोळी उपस्थित होते. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड. संदीप कोळी म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास, देशप्रेम, राष्ट्रभक्ती व समाजिक भान इत्यादी गुण माझ्या अंगी रुजले गेले. आज मी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वकिली करत असून या सर्वांमध्ये महाविद्यालयाचा मोठा वाटा राहिला आहे. आपल्या शिक्षण व ज्ञानाचा फायदा गावकरी व समाजासाठी झाला पाहिजे, हा एकमेव उद्देश ठेवून हे विशेष श्रमसंस्कार शिबिर खलाटी गावामध्ये घेण्याचा आम्ही गावकऱ्यांनी नियोजन केले आहे. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुशांत मोरे, सूत्रसंचालन आरती कोळी तर आभार सागर पिरगोंड  यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. पुंडलिक चौधरी, डॉ. राजेंद्र लवटे, बंडू शेजुळ, पोपट कोळी, ज्ञानेश्वर तुकाराम देवकते, महेश कोळी, शशिकांत कोळी, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, बाळासो पुजारी, व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




To Top