खो-खो विश्वचषक विजेत्या प्रतीक वाईकरची इनसाइड स्टोरी...

Admin
खो-खो विश्वचषक विजेत्या 
प्रतीक वाईकरची इनसाइड स्टोरी... 

मुंबई : हॅलो प्रभात
रविवारी झालेल्या खो - खो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 54-36 अशा शानदार फरकाने पराभूत करत खो-खो विश्वचषक जिंकला. महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते होण्याचा मान पटकावला आहे. तब्बल २० देशांचा सहभाग असलेल्या या विश्वस्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार व उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रतीक वाईकर यांनी मोलाची कामगिरी केली. विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतीकचे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतीकच्या प्रवासाची  इनसाइड स्टोरी... 
क्रीडा कोट्यातून १९ जून २०१२ मध्ये प्रतीक वाईकर वयाच्या १९ व्या वर्षी महावितरणमध्ये रुजू झाले. दि. २७ मार्च १९९२ रोजी जन्मलेले प्रतीक यांनी सन २००० च्या सुमारास बास्कटेबॉल, लंगडी व गोल खो-खो खेळायला सुरवात केली. प्रामुख्याने खो-खो खेळातील चपळाई व प्रगती पाहून पुण्याच्या नामांकित नवमहाराष्ट्र क्लबमध्ये प्रतीक यांना प्रवेश मिळाला. तेव्हापासून ते उत्कृष्ट खो-खो पटू म्हणून घडत गेले. संगणकशास्त्रात बीएस्सी पदवीधर असलेल्या प्रतीक यांनी फायनान्समध्ये एमबीए केलेले आहे. त्यामुळे खेळ व अभ्यास या दोहोंना कायम महत्व दिल्याने कुटुंबियांचे देखील प्रतीक यांना खो-खो खेळण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त असलेले प्रतीक यांनी महाराष्ट्र संघाच्या १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील व १८ वर्षाखालील वयोगटाचे व वरिष्ठ गटाचे नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव खो-खो पटू आहे. खो-खो मध्ये मातीकडून मॅटकडे प्रवास सुरु केल्यानंतर दुखापत होण्याचा धोका वाढला तरी कौशल्य, चपळाई व शारीरिक फिटनेसकडे अधिक लक्ष देत प्रतीक यांनी व्यावसायिक खो-खो स्पर्धेत भाग घेणे सुरू केले. यात खो-खो प्रोफेशनल लिगमध्ये तेलगू योद्धांचे नेतृत्व करीत उपविजेतेपद पटकावले.


यानंतर प्रथमच होत असलेल्या खो - खो विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. विश्वचषक विजयानंतर प्रतीकने आपल्या खो-खो प्रवासाबद्दल आभार व्यक्त करत, फॅन्स, कोच आणि सेलेक्टर्सच्या समर्थनाचे महत्त्व सांगितले. त्याने आपल्या टीमच्या सुसंगततेला, मानसिक सामर्थ्याला आणि खेळाच्या पद्धतीला विशेष श्रेय दिले. "टीम वर्क, दृढ संकल्प आणि विजयाची प्रेरणादायी कथा लक्षात ठेवा," अशी प्रेरणादायक गोष्ट त्याने सांगितली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशाचं हृदय जिंकलं आहे आणि सध्याच्या घडीला खो-खो खेळाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे, असे मत त्याचे व्यक्त केले. 


Tags
To Top